रत्नागिरी : ‘आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५मध्ये आला, ज्यामध्ये कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली. केंद्र व राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापनाला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे,’ असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वार येथे आपत्ती व्यवस्थापनाच्या चित्ररथाचे जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, रत्नागिरीचे प्रांतधिकारी अमित शेडगे, चिपळूणच्या प्रांतधिकारी कल्पना जगताप, खेडचे प्रांतधिकारी श्री. सोणाने, रत्नागिरीचे तहसीलदार मच्छिंद्र सुकटे, नैसर्गिक आपत्तीचे अजय सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी जिल्हाधिकारी म्हणाले, ‘आपत्ती ही दोन प्रकारची असते. एक मानवनिर्मित आणि दुसरी नैसर्गिक आपत्ती. या दोन्ही प्रसंगी नागरिकांनी कसे राहिले पाहिजे, दैनंदिन जीवनात वागण्यात कोणत्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजेत, या प्रसंगी विचलित न होता दुसऱ्याला मदत कशी केली पाहिजे याबाबत चित्ररथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेला लोकशिक्षण आपत्ती व्यवस्थानाच्या या उपक्रमातून देण्यात येणार आहे. चित्ररथ नऊ ते १७ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात दाखविण्यात येणार आहे.
‘घरामध्ये गॅस लिकेजमुळे आग लागणे, भुंकप, दरडी कोसळणे यांसारख्या आपत्तींवर आपण आपल्या वागण्यात काही गोष्टी अंगिकारल्या, तर मात करू शकतो. आपल्या गावामध्ये वाहनचालक, उत्कृष्ट पोहणारी व्यक्ती अशा लोकांची एक यादी तयार असणे गरजेचे आहे, जेणेकरून अशा लोकांच्या मदतीने आलेल्या आपत्तीवर आपण मात करू शकतो. याआधीही जिल्ह्यात बऱ्याच आपत्ती आल्या: परंतु आपण सर्वांनी एकोपाने त्याला सामोरे गेलो आहोत, यापुढेही अशाप्रकारच्या आपत्तींना आपण एकोपाने सामोरे जाऊ,’ असा विश्वास जिल्हाधिकारी या वेळी व्यक्त केला.